क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके
ऐक्य समूह
Wednesday, September 08, 2010 AT 11:42 PM (IST)
ज्यांचे नाव घेताच इंग्रज काळे निळे पडत, अशा या क्रांतीकारकाचे नाव वासुदेव बळवंत फडके होय. त्यांचा जन्म पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे 4 नोव्हेंबर 1845 रोजी झाला. पुण्याला नोकरीला असताना त्यांची आई खूप आजारी पडली. त्यामुळे गावी जाणे त्यांना भाग होते. परंतु त्यांना सुट्टी देण्यात आली नाही. शेवटी कार्यालयात चिठ्ठी ठेवून ते आपल्या गावी आले. तत्पूर्वी आईचे निधन झाले होते. आईची भेट न झाल्यामुळे ते दु:खी होते. सुट्टी न देणाऱ्या अधिकाऱ्याचा राग आला. त्यामुळे इंग्रजांविरुध्दचा त्यांचा रोष वाढतच गेला. पुढे स्वत:चे खडे सैन्य उभे केले. बऱ्याच जिल्ह्यांत त्यांचा दरारा निर्माण झाला. त्यामुळे इंग्रज हैराण झाले होते. वासुदेव बळवंतांना पकडण्यासाठी चार हजारांचे इनाम जाहीर केले. हे त्यांना कळताच त्यांनी अशी घोषणा केली की, मुंबईचे राज्यपाल व आपल्या सहकाऱ्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावणारे पुणे जिल्हाधिकारी व सत्र न्यायाधिश यांचे मस्तक आणून देणाऱ्यांना अनुक्रमे पाच व तीन हजारांची बक्षिसे दिली जातील. देशासाठी स्वत:च्या आयुष्याची होळी करणारे वासुदेव बळवंत फडके यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली. पुढे अन्नत्याग करुन 17 फेब्रुवारी 1883 रोजी त्यांचा देह चितेवर ठेवण्यात आला.
तात्पर्य : देशासाठी स्वत:चे आयुष्य अर्पण करुन आदर्श निर्माण करावा.