स्थापत्यशास्त्रज्ञ
ऐक्य समूह
Thursday, September 02, 2010 AT 10:50 PM (IST)
एके दिवशी विश्वेश्वरैया रेल्वेने प्रवास करीत होते. प्रवासात ते नेहमी ग्रंथांचे वाचन करीत असत. त्यांच्या समोरचे प्रवासी पत्ते खेळत मोठमोठ्याने गप्पागोष्टी करीत होते. अशावेळी विश्वेश्वरैया वाचत असताना एकदम उठले व त्यांनी डब्यातील साखळी ओढली व पुन्हा ते वाचण्यात मग्न झाले. साखळी खेचताच गाडी थांबली आणि गार्ड चौकशीला आला. ही गाडी ग्रंथ वाचणाऱ्या गृहस्थाने थांबवली हे गार्डला कळताच गार्ड विश्वेश्वरैयाकडे येऊन म्हणाला, "साखळी ओढली की दंड भरावा लागतो, हे आपणाला माहिती असेलच.' त्यावर ते म्हणाले, "दंड भरीन, परंतु येथून 1 मैलावर रुळ आहेत का याची चौकशी-तपासणी करा, नंतरच गाडी पुढे न्या.' आणि खरोखरच एक मैल अंतरावर रुळ उखडले गेले होते. आपल्या शास्त्रात निष्णात असलेला स्थापत्यशास्त्रज्ञ वाचनात दंग असूनही वस्तू, गती, नाद याची कानांना इतकी सवय झाली होती की, मैलावर नसलेले रुळ केवळ वेगळ्या नादावरुन त्यांनी जाणले. स्थापत्यशास्त्रज्ञ विश्वेश्वरैयांमुळे पुढे होणारा भीषण अपघात टळला. हे कळताच प्रत्येक प्रवाशाने त्यांचे आभार मानले.
तात्पर्य : आपल्या विषयातील परिपूर्ण ज्ञान असावे.