सूक्ष्म शरीराची प्रगती
ऐक्य समूह
Wednesday, August 25, 2010 AT 11:21 PM (IST)
प्रवाही स्थितीची-सूक्ष्म शरीराची प्रगती सूर्याच्या सत्तेने होत असते. सूर्याचा प्रकाश आणि उष्णता ही जसजशी सूक्ष्म शरीराला मिळावी तसतसे ते अधिक विरल होऊ लागते. मनुष्याला जसजसे आत्मज्ञान अधिक होते, तसतसे त्याचे सूक्ष्म शरीर अधिक विरल होते आणि त्याची बरीच प्रगती होते. त्याचे सूक्ष्म शरीर विरल-बाष्परुप झाल्यामुळे त्यात ते देहरुपी घटात असले तरी-सूर्याचे प्रतिबिंब पडत नाही. प्रतिबिंब किंवा मिथ्या अहंकार सूर्याशी एकरुप होऊन जातो. येथेही वनस्पती वर्ग आणि पशू वर्ग यांच्याप्रमाणे कर्तृत्वाची भावना किंवा अहंकार असत नाही. प्रतिबिंब किंवा अहंकार यांचे या स्थितीत दर्शन नाही. माझे, तुझे अशी भावना किंवा वाणिज्यवृत्ती, कर्तृत्वाचे श्रेय घेणारा अहंकार हे सर्व पार नाहीसे होतात.
घन आणि प्रवाही पदार्थ एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात घालता येतात. गॅस-वायूरुप पदार्थ तसे घालता येत नाहीत. गॅस धारण करणारा घट फुटला की, गॅस वातावरण पसरतो. जन्म-मरणाच्या फेऱ्यांतून सुटावे आणि अंतिम स्थिती-मुक्ती-मिळवावी हेच सर्व हिंदू लोकांचे ध्येय आहे. पुनर्जन्माच्या तडाक्यातून निसटून देहमुक्त होणाऱ्या सुपुत्राला जन्म देणे हीच हिंदी मातांची उच्चतम महत्वाकांक्षा असते.
सूक्ष्म शरीर कशाचे केलेले असते?
ते मनोविकार, वासना, मनोवृत्ती आणि विचार यांचे बनलेले असते. मुक्त पुरुषाच्या वासना नि:स्वार्थ असतात. निर्लोभी, नि:स्वार्थी आणि उदार अशा वासनांनी बनलेले सूक्ष्म शरीर वायुरुप स्थितीसारखे असते. सूक्ष्म शरीर धारण करणारा घट फुटला म्हणजे ते सूक्ष्म शरीर गॅसप्रमाणे घनस्थितीत न राहता एकदम सर्व विश्वात मिसळून जाते. सूर्याच्या उष्णतेमुळे, एका जागेतील हवा विरल होते आणि वर जाऊ लागते आणि ती जागा रिकामी होते. याचा परिणाम काय होतो? रिकामी जागा भरुन काढण्यासाठी चारी बाजूंची हवा तेथे झपाट्याने येते अथवा खेचली जाते.