लोकमान्यांची ईश्वरनिष्ठा
ऐक्य समूह
Wednesday, August 25, 2010 AT 11:19 PM (IST)
लोकमान्यांची परमेश्वरावर नितांत श्रध्दा होती. पण तिचे ते कधीही जाहीर प्रदर्शन करीत नसत. त्यांनी गीतारहस्याची पाहिली प्रत पंढरपूरला श्री पांडुरंगाला अर्पण केली. दुसरी प्रत पुण्याच्या कसबा गणपतीला व तिसरी प्रत महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांना स्वत: अर्पण करुन त्यांचे आशीर्वाद घेतले.
एकदा वऱ्हाड प्रांतातील एका गावात लोकमान्यांच्या सत्काराचा समारंभ होता. लोकमान्यांना समारंभपूर्वक कार्यक्रमाच्या ठिकाणी आणले. लोकमान्यांसाठी गालिचा घातला होता. लोकमान्य बैठकीवर उपस्थित झाले. पण त्यांना त्या क्षणी काय वाटले कुणालाच समजले नाही. त्या घाईगर्दीतही लोकमान्यांनी झटकन तो गालिचा गुंडाळून बाजूला ठेवला. समारंभ संपल्यावर कार्यकारी मंडळाच्या लोकांना लोकमान्यांनी गालिचा का गुंडाळून ठेवला हे कळले. त्या गालिचावर श्री दत्तात्रयांचे चित्र होते. श्रीदत्तात्रयांच्या चित्रावर पाय पडू नये म्हणून लोकमान्यांनी तो गालिचा गुंडाळून ठेवला होता. हे सर्वांच्या लक्षात आले. लोकमान्यांची ही ईश्वरनिष्ठा, भक्ती पाहून सर्वजण त्यांच्यापुढे नतमस्तक झाले.
तात्पर्य : देव हा मानण्यावर असतो, दिखाव्यावर नसतो.