महिलांनी बचतगटाद्वारे उत्कर्ष साधावा : श्रीमती सिन्हा
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 11:01 PM (IST)
वाई, दि. 13 : महिला बचतगटांनी कार्यरत राहून आपला व कुटुंबाचा विकास साधावा. आरोग्य, बचत याकडे बारकाईने लक्ष ठेवावे. स्वावलंबी झाल्याशिवाय स्त्रियांना कुटुंबात व समाजात मान मिळत नाही. महिलांनी बचतगटाद्वारे आपला उत्कर्ष साधावा, असे उद्गार माणदेशी महिला सहकारी बॅंकेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांनी काढले. वाई नगरपरिषदेच्या वतीने आयोजित जागतिक महिलादिन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सौ. अर्चना मकरंद पाटील होत्या. वाई नगरपरिषद शाळा क्र. 5 च्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गायिले. नगराध्यक्षा सौ. नीलिमा खरात यांनी प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचेे शाल, श्रीफळ, महागणपतीची फोटो फ्रेम व सन्मानचिन्ह देवून सत्कार केला. यावेळी महालक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचतगट सिध्दनाथवाडी, एकनाथ श्री स्वयंसहाय्यता महिला बचतगट सोनगिरवाडी, समृध्दी स्वयंसहाय्यता महिला बचतगट रविवार पेठ, दारिद्र्यरेषेखालील बचतगटांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल ट्रॉफी व पुष्पगुच्छ देवून सौ. अर्चना पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले. श्रीमती चेतना सिन्हा यांच्या हस्ते विविध बचतगटांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल ट्रॉफी व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. नगरसेविका सौ. स्वाती इथापे यांनी सूत्रसंचलन केले. डॉ. सौ. मेघा घोटवडेकर यांनी परिचय करुन दिला.