राज यांना सुप्रीम कोर्टाच्या कानपिचक्या..!
PTI ---
Wednesday, March 10, 2010 AT 01:42 AM (IST)
नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या परप्रांतियांविरोधात तुझी प्रक्षोभक भाषणे जोपर्यंत सुरू राहतील तोपर्यंत तुझ्यावर देशाच्या वेगवेगळ्या भागात खटले दाखल होतच राहतील. आजही तू आक्रमक विधाने करतो आहेस, हे का थांबवत नाहीस? अशा कठोर शब्दात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कानउघाडणी केली.
मनसेच्या स्थापनेला आज चार वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने काल दिलेल्या या इशाऱ्याला वेगळेच महत्व आहे. राज ठाकरे यांनी दीड वर्षापूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारी भैय्यांविरुध्द जोरदार मोहीम उघडली. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान असे मुद्दे घेवून त्यांनी राज्यातल्या भैय्यागिरीवर हल्ला चढविला. त्यांच्या भाषणाने तरुण पेटून उठला आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हल्लाबोल झाला.
मराठी जनाशी प्रतारणा नाही : राज
दरम्यान, मराठी माणसाच्या भल्यासाठी, भूमिपुत्रांच्या उन्नतीसाठी आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी आम्ही सतत काम करत राहू, मराठी माणसाशी कधीही प्रतारणा करणार नाही, असे वचन राज ठाकरे यांनी मनसेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्तमुंबईत यशवंतराव चव्हाण नाट्य मंदिरात मंगळवारी झालेल्या मेळाव्यात बोलताना दिले.