Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विवाहितेची चिमुकलीसह आत्महत्या
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 01:36 AM (IST)
Tags: regional
पाचगणी, दि. 9 : चार वर्षापूर्वी झालेल्या लग्नातील हुंड्याचे राहिलेले 50 हजार रुपये माहेरहून आणण्यासाठी सासरच्या लोकांनी केलेल्या जबर शारीरिक व मानसिक छळास कंटाळून बेलोशी, (ता. जावली) येथील सौ. शीतल रणजित खरात हिने आपल्या दोन वर्षाच्या चिमुरडीसह कुर्ला मुंबई येथे रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली. याबाबतची तक्रार विवाहितेचे चुलते शेखर तुकाराम गायकवाड यांनी कुर्ला पोलिसांना दिली आहे. त्यात त्यांनी शीतलचा नवरा, सासू, सासरा, दीर, मामा, मामी यांच्या विरोधात तक्रार केली आहे.
याबाबत पोलीस स्टेशन व नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत शीतल हिचा विवाह चार वर्षापूर्वी बेलोशी येथील रणजित संपत खरात यांचेशी झाला होता. शीतल यांचे मूळगाव दांडेघर (ता. महाबळेश्वर) असून खरात यांचे नात्यातील आहेत. शीतलच्या विवाहावेळी माहेरच्या लोकांनी शीतलला एक तोळे सोन्याचा हार, कर्णफुले, संसारोपयोगी साहित्यांसह लग्न लावून दिले. त्याबरोबरच रणजित यास दीड तोळ्याची सोन्याची अंगठीही घातली.
लग्नानंतर रणजित खरात व शीतल हे आपल्या कुटुंबासह ठाणे (पूर्व) येथे रहावयास गेले. ठाणे येथे रणजितचे आई-वडील रहात होते. लग्नानंतरचे पहिले सहा महिने सर्व काही व्यवस्थित होते. परंतु सहा महिन्यानंतर सगळेच चित्र बदलले.    शीतलचा पती तिला टोचून बोलू लागला. लग्नावेळी हुंड्यापोटी जास्त सोने व रोख रक्कम दिली नाही, यावरून शीतलशी तो भांडणे करीत होता. दोन्ही कुटुंबाची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर शीतलच्या सासू-सासरे व पतीने तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले. त्याबराबेरच रणजितची मामी शशिकला गंगाधर बगाडे (वय 45) रा. भीमनगर, पाचगणी हिनेही शीतलला हुंड्यासाठी टोचून बोलून मानसिक छळास सुरुवात केली. खरात कुटुंबियांच्या मानिसक छळास शीतल पुरती कंटाळली होती.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: