राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तुळजाराम चतुरचंद कॉलेजचे यश
ऐक्य समूह
Saturday, January 28, 2012 AT 12:54 AM (IST)
सातारा, दि. 27 : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीतर्फे नुकत्याच झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद कॉलेजच्या गणेश लोंढे व मधुरा सहस्रबुध्दे यांनी सांघिक विजेतेपद मिळवले.
त्यांना कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते चषक देण्यात आला. यावेळी संस्थेचे माजी सचिव प्राचार्य जे. जी. जाधव उपस्थित होते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत कर्मवीर, संत गाडगे महाराज
व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या योगदानाचा भालेराव यांनी काव्यमय शैलीत गौरव केला. कर्मवीरांवर कविता केल्याशिवाय मला मरण येऊ नये अशी त्यांनी भावना व्यक्त केली. भालेराव यांनी बाप, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, माझ्या जन्माची कहाणी, कुणब्याच्या पोरा या कविता सादर केल्या.
प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, प्रा. डॉ. रणधीर शिंदे, प्रा. डॉ. राजशेखर शिंदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. वेदांत कुलकर्णी, सतीश देशपांडे, माधवी रॉय, मुग्धा जोशी, ऋषी लाला यांनी मनोगत व्यक्त केले. प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक आर. के. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संभाजी पाटील यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या सेवकांनी परिश्रम घेतले.